वसुंधरेच्या संरक्षणासाठी आळंदी नगरपरिषद कटिबद्ध : मुख्याधिकारी अंकुश जाधव
आळंदी, प्रतिनिधी – वसुंधरेचे रक्षण साठी भूतलावरील पंचमहाभूते जल, वायू,अग्नी,आकाश आणि पृथ्वी या सर्व क्षेत्रात आळंदी नगरपरिषद कार्य करणे कटिबद्ध असून आळंदी नगरपरिषद आणि अविरत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान तसेच माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत आळंदी शहरात जनजागृती करण्याच्या दृष्टीने पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर,उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया,गटनेते पांडुरंग वहिले,नगरसेवक सागर भोसले,आदित्य घुंडरे,श्रीमती रुक्मिणीताई कांबळे,श्रीमती सुनीताताई रंधवे नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.
या अभियानाची माहिती देताना मुख्याधिकारी अंकुश जाधव म्हणाले की माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत वायू प्रदूषण कमी करणे तसेच इंधन बचतीसाठी नागरिकांनी सायकलचा अधिकाधिक वापर करणे तसेच शहरात आत्म प्रोत्साहन द्वारे सर्वांनी आठवड्यातील एक दिवस No Vehicle Day साजरा करावा, यावेळी स्वच्छते बाबत प्रतिज्ञा घेऊन माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत कार्याची माहिती देण्यात आली तसेच विविध प्रकारचे संदेश असलेले बॅनर व पर्यावरण पूरक झेंड्याचे वापर करून मुख्याधिकारी,नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच अविरत फाऊंडेशनचे निसार सय्यद आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.