आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडून कबड्डी स्पर्धेच्या तयारीची पाहणी

0 26

परभणी,दि 30 (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने येत्या ३ ते ६ डिसेंबर दरम्यान शहरातील क्रोदी रोडवरील मैदानात संपन्न होत असलेल्या ४९ वी कुमार- कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या मैदानास आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी भेट देऊन पाहणी केली.

मोठ्या भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पाहाण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती असणार आहे.
रुग्णवाहिका, डॉक्टर टीम, पोलीस प्रशासन व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळ, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, प्रेक्षक बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था, खेळाडूंसाठी विश्रांतीगृह, पत्रकार कक्ष, लाईट व्यवस्था, सुरक्षारक्षक इत्यादी सोयींच्या बाबत आ.डॉ.गुट्टे यांनी याप्रसंगी सूचना केल्या. व प्रत्येक समितीशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर केल्या. तसेच स्पर्धेच्या उद्घाटनास राज्याचे ग्रामविकास व क्रिडामंत्री ना.गिरीष महाजन तर बक्षिस वितरण समारंभास सहकार मंत्री ना.अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, प्रशासकीय अधिकारी व इतरही मान्यवर उपस्थित राहाणार असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री मंगल पांडे, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, रासप शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, अ‍ॅड.मिलिंद क्षिरसागर, बाबा पोले, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, प्राचार्य उत्तम देवकते, क्रीडा शिक्षक विठ्ठल डुमनर, सुमित कामत, विलास राठोड, माणिक नागरगोजे, राजेश राठोड, राष्ट्रीय पंच योगेश जोशी, प्रभाकर सातपुते उपस्थित होते.

स्पर्धेत राज्यभरातील ५२ संघ सहभागी होणार आहेत. दररोज सायंकाळी ५ ते १० या वेळेत सामने खेळविले जाणार आहेत. प्रत्येक खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था संयोजकांनी केली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या असून सर्व समित्या आपापली जबाबदारी चांगल्या पध्दतीने पूर्ण करीत आहेत. त्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कबड्डी स्पर्धेची उत्सुकता खेळाडूंसह आयोजकांनाही आहे.

दरम्यान, कबड्डी स्पर्धेचे नियोजन उत्तम पध्दतीने सुरू असून खेळाडूंना चांगले खेळता यावे, याकडे आम्ही विशेष लक्ष देत आहोत. त्यासाठी सर्व सोई उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पारदर्शकपणे स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव अ‍ॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!