औरंगाबाद-उस्मानाबादनंतर अहमदनगरचं नामांतर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

0 178

: औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर आहेत. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आहिल्यादेवींचं माहेरचं आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे. आज येथे रामभाऊ शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी मागणी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. तसेच तुमच्या सर्वाच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याआधी राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं होतं. आता या दोन शहरांनंतर अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. नामांतराचा हा प्रस्वात आता मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि याबाबत केंद्र सरकारला कळवलं जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर होईल.

error: Content is protected !!