मुंबई – सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलं /मुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडायच्या कारणाने अनेक ऑनलाईन matrimonial वेबसाईटवर नोंदणी करतात, तसेच बऱ्याच विवाह जमविणाऱ्या संस्थांनी पण आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत ज्यावर ते सर्व उपवर मुले व मुलींच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत. बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती , परिवाराची माहिती व फोटोज अपलोड करत आहेत. अशा वेबसाईट या सायबर भामट्यांकरिता या लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवुणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळाबाजारात विकण्यास एक्दम सोपे असे target आहे.
अशा matrimonial वेबसाईटद्वारे ऑनलाईन फसविले जाणाऱ्यांची संख्या देखील बऱ्याच प्रमाणात आहे. दुर्दैवाने या मध्ये फसविले गेलेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने जास्त आहे. या फसवुणुकीचे अनेक प्रकार आहेत
१) जेव्हा अशा प्रोफाईल बनविल्या जातात तेव्हा काही दिवसातच तुम्हाला प्रोफाईल match झाल्याचे notification येते, यात बऱ्याचदा match झालेली प्रोफाईल ही कोणत्यातरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाची असते. (आपल्याकडे परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषतः उपवर मुलींच्या पालकांच्या मनात सुप्त आकर्षण असते त्यामुळे सायबर भामटे मुख्यतः अशाच प्रोफाईल चा आधार घेतात). हळू हळू संवाद वाढतात, ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने मोहित करते. ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केलातरच कॅमेरा वर विडिओ कॉल होतो. मग एकेदिवशी हि व्यक्ती तुम्हाला सांगते कि ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहेत. नंतर फोन येतो कि तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व custom clearance करिता अडकले आहे त्यामुळे एका ठराविक अकाउंट मध्ये ऑनलाईन ठराविक रक्कम भरावी कि २ दिवसात तुमचे पार्सल तुम्हास मिळेल. पैसे अकाउंटमध्ये भरले कि ना पार्सल येते तो नंबरपण बंद होतो व तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक deactivate होते .
२) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण प्रकार क्रमांक १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुरु होते ,संभाषणात एकमेकांदबद्दल जवळीक निर्माण होऊन अनेक वयक्तिकव खाजगी फोटोज व माहिती शेअर केली जाते. हळू हळू समोरची व्यक्ती मग तुम्हाला black mail करण्यास सुरु करते कि अमुक अमुक रक्कम तुम्ही न दिल्यास तुमचे फोटोज व माहिती सोशल मिडिया वर प्रसारित केली जाईल.
३) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण प्रकार क्रमांक १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुरु होते, पण या प्रकारात मुख्यतः फसविली जाणारी व्यक्ती या एकतर घटस्फोटित ,किंवा ज्यांचे जोडीदार जग सोडून गेलेत, किंवा ज्यांचीलग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर प्रकार क्रमांक १ प्रमाणेच समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने, तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि आपण जर या अशा matrimonial वेबसाईटचा वापर करत असाल तर सावध राहा . प्रोफाईल बनविताना आपली सर्वच माहिती त्यात देऊ नका तसेच फक्त एखाद दुसरा फोटोच अपलोड करा. प्रत्यक्ष मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल क्रमांक देऊ नका घरातील कोणत्यातरी वयाने मोठ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक contact नंबर करून द्या . तसेच परदेशातील भारतीय प्रोफाईल ने match केले म्हणून हुरळून जाऊ नका उलट अशा स्थळाची अजून सखोल चौकशी करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी समोरची व्यक्ती खरी आहे याची तुम्हाला खात्री झाली तरीदेखील आपली सर्व वैयक्तिक माहिती व खाजगी फोटोज शेअर करू नका. तसेच जर अशी व्यक्ती तुमच्याकडे काही आर्थिक मदत मागत असेल तर वेळीच सावध राहा. ज्या व्यक्ती विशेष करून महिला ज्या पुनर्विवाह करण्यास ईच्छूक आहेत, त्यांनी तर जास्त सावध राहणे गरजेचे आहे. सायबर भामटे अशाच व्यक्तींना विशेषतः महिलांना आपले लक्ष करत असतात .
महाराष्ट्र सायबर या सर्व matrimonial वेबसाईट व ज्या विवाह संस्था ऑनलाईन नोंदणी करत आहेत त्यांना देखील विनंती करते कि सावध राहा . आपल्याकडे नोंदणी करणाऱ्या विवाहोच्छूक व्यक्तीस नोंदणी करताना आपले ओळखपत्र पण अपलोड करायला सांगा . विशेषतः परदेशातील भारतीय नागरिक जर नोंदणी करत असतील तर त्यांच्याकडून ओळखपत्र म्हणून त्यांच्या passport ची प्रत देणे हे अनिवार्य करा तसेच त्यांना भारतामध्ये राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईकाचा पत्ता व ओळखपत्र देणे बंधनकारक करा . तुमची वेबसाईट ही सुरक्षित आहे याची वेळोवेळी खात्री करून घ्या कारण तुमच्या वेबसाईटचा वापर करून उद्या कोणत्याही व्यक्तीची आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवुणूक झाली तर माहिती तंत्रज्ञान कायदा २०००,कलम ७९(३)(ब) अंतर्गत तुम्हाला पण जवाबदार धरले जाऊ शकते व तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते .
तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर देखील त्याची नोंद करा .
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.
शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात; कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार