राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. अजूनही आयकर विभाग आणि ईडीची तपासणी सुरु आहे. घरातील कुणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाहेरच्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.
चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात ईडीची कारवाई
पुणे येथे हसन मुश्रीफ यांच्या भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात ईडीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. ब्रिक्स इंडीया प्रायव्हेट लिमीटेड, ई स्केअरसमोर, पेट्रोल पंपाच्या मागील इमारत, पाचवा मजला येथे ही कारवाई सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून झाडाछडती सुरु आहे.
चंद्रकांत गायकवाड, संचालक ब्रिक्स इंडीया प्रा. लि. लापिझ लाजुली, लेन नं. 5, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मश्रिफांचे व्यसायिक भागीदार आहेत. ते ब्रिक्स इंडीया कंपनीचे संचालक आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना ब्रिक्स इडीयाने उभारला आणि अप्पासाहेब नलावडे कारखाना देखील हीच कंपनी चालवत होती. तसेच गायकवाड व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी आहेत. कोलकात्ता स्थित कंपन्यांमधून पैसे मश्रिफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाडचा हात असल्याचा आरोप आहे.