सत्यनिष्ठ महापुरुषांच्या विचारांतून घडेल आदर्श पिढी ! डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

0 47

पुणे,दि 18 (प्रतिनिधी)ः
“कट्टरतावादी राजकीय, धार्मिक संस्थांकडून विषाची पेरणी होत असल्याने समाजात दुफळी माजली जात आहे. अशावेळी माणुसकी, बंधुता, समता, सत्य आणि अहिंसेच्या विचारांची पेरणी करणे आवश्यक आहे. सत्यनिष्ठ महापुरुषांचे विचार नव्या पिढीसमोर मांडले, तर एका आदर्श पिढीची निर्मिती केल्याचे भाग्य आपल्याला लाभेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. देशाला, जगाला वाचविण्यासाठी मानवता रुजवणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सेवाकार्यातून समाजासाठी योगदान देणाऱ्या कृषी, पर्यटन, पर्यावरण, वैद्यकीय, पोलिस, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशन व अ‍ॅग्रो टुरिझम विश्व यांच्या वतीने सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला रूरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, सचिव मनीषा उगले, राधेय सामाजिक संस्थेचे सूर्यकांत पोतुलवार, संयोजन समितीतील पवन घटकांबळे, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, यशदा येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. बबन जोगदंड, बायोस्पीयर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, देहू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन घेरडे, चित्रपट दिग्दर्शक अक्षय इंडीकर, कृषी उद्योजक रितेश पोपळघट, कार्तिकेयन्स जनसेवा फाउंडेशनच्या ऍड. मोनिका गावडे यांना ‘सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी भारती प्रकाशनचे सिद्धेश्वर हाडबे, गुट्टे प्रकाशनच्या डॉ. आशालता गुट्टे व जी. के. प्रकाशनचे गणेश काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सगळ्या धर्मात चांगली-वाईट माणसे असतात. त्यातील चांगल्या विचारांच्या बेरजेतून आपण वाटचाल केली पाहिजे. अनेक राष्ट्रप्रमुखांच्या वागण्यातून आजही हिटलरशाही वृत्तीचा प्रत्यय येतो. याला छेद द्यायचा असेल, तर मानवतेची जाण असलेल्या समाजाची निर्मिती व्हायला हवी. सर्व धर्माचा अभ्यास करून त्यातील मानवी मूल्यांना आत्मसात करावे. भविष्यातील जैविक हत्यारांचा धोका ओळखून विधायक संशोधन करण्यावर भर द्यायला हवा. युवाशक्ती देशाचे भवितव्य आहे. त्याला प्रेरणा देण्यासाठी बुद्ध, महावीर, गांधी या त्रिकुटाचे विचार महत्वाचे आहेत. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सर्वानी पर्यावरण संवर्धन, जनसामान्यांचे कल्याण यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत.”

प्रदीप लोखंडे म्हणाले, “पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या मूलभूत गोष्टी गावखेड्यांत पोहोचायला हव्यात. ग्रामीण भागात विकासाची ही गंगा पोहोचली, तर गावखेडे स्वयंपूर्ण होतील. समाजकार्य करताना आपण स्वतः सक्षम असायला हवे. नव्या बदलांना आत्मसात करत सकारात्मक भावनेतून आपले काम लोकांपर्यंत पोहोचवावे. समाजात पुन्हा एकदा वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज असून, त्यासाठी लोकांच्या आवडीनुसार वाचन साहित्य द्यायला हवे.”

प्रास्ताविकात गणेश चप्पलवार म्हणाले, “माझे आजोबा परभन्ना चप्पलवार यांनी केलेले सेवाकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे करतानाच समाजात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचा कृतज्ञता सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्याकडून चांगले शिकण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.”
अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत पोतुलवार यांनी आभार मानले.

error: Content is protected !!