भारती सावंत यांच्या ‘किलबिल’ बालकवितासंग्रह आणि ‘प्राक्तन’ या कथासंग्रहाचे प्रकाशन
मुंबई दि 15 (प्रतिनिधी)ः
बाल दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध वृत्तपत्र स्तंभलेखिका आणि कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत, खारघर, नवी मुंबई यांच्या ‘किलबिल’ बालकवितासंग्रह आणि ‘प्राक्तन’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.14) पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व साहित्यिकांनी भारती सावंत यांच्या पुस्तकांची ग्रंथदिंडी खांद्यावर घेऊन हॉल आणि परिसरात छोटीशी मिरवणूक काढली. त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या देशपांडे यांनी आपल्या भजनाने ग्रंथदिंडीमध्ये रंगत आणली.सौ. सावंत यांच्या दोन्ही स्नुषा सौ. प्रियांका आणि सौ.प्रिया तसेच यजमान दिलीप सावंत, मुले निखील आणि गौरव यांनी ग्रंथ दिंडीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
सौ. भारती सावंत यांची बालमैत्रीण शबाना मुल्ला यांनी स्वागत गीत गायीले. सौ. भारती सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना आपण समाजाचे काही देणे लागतो आणि समाजात रहात असताना समाजाविषयी भान राखणे किती आवश्यक आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे आपण परिस्थितीने घरातच अडकून पडलो होतो आणि आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व साहित्यिकांनी एकत्र यावे म्हणून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. सूत्रसंचालन सुरेखा गायकवाड आणि सौ. गौरी शिरसाट यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून एस. एन. डी. टी.मध्ये प्रोफेसर असणारे (आत्ता सेवानिवृत्त) डॉ. शशिकांत लोखंडे हे होते. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पुस्तकातील आवडलेल्या कथा आणि त्रुटी याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून कवी डॉ. राम शिंदे हे होते.
ज्ञानसिंधू प्रकाशनाचे प्रकाशक तान्हाजी खोडे, सागर तायडे,. सौ. सुरज गाजरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. गौरी शिरसाट यांनी आभार मानले.सौ. सविता काळे, सौ सुचित्रा कुंचमवार, सौ. विजया चिंचोली यांनी उपस्थिती दाखवली.