भाव वाढीने गॅस पेक्षा चुलच बरी… ग्रामीण भागातील महिलांचा सुर
निफाड,दि 18 (प्रतिनिधी)ः
रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन मिळणे बंद झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ‘उज्वला’ योजना आली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत.दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही.त्यामुळे जवळपास सव्वासात लाख ‘उज्वला’ पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.चूल आणि मुल’ एवढ्यापर्यंतच मर्यादित असलेली महिला आज शिक्षणाच्या जोरावर पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहे.हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो.चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले.त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला.सुरवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाठ वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्यात आली.तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली.त्यामुळे पुन्हा सरपणाची ‘चुल’च बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला. सध्या गॅस सिलिंडरचा दर १००० रुपये पर्यंत झाला आहे.हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या गॅस भाववाढीने चुलीच्या वापराचे प्रमाण अधिक झाले आहे.