वंचितसोबतच्या आघाडीबाबत शरद पवारांचे स्पष्ट मत, पहा काय म्हणाले…
कोल्हापूर – वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरेंसोबत युती केली. मात्र वंचितचा समावेश महाविकास आघाडीत अद्याप तरी झालेला नाही. आमच्यासोबत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. आघाडीत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा प्रस्तावही आला नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच आमच्या आजवर ज्या चर्चा झाल्यात त्यानुसार ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं ठरलं आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याच्या चर्चा आहेत त्यावर तुम्हाला काय वाटत असा सवाल पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या दोघांमध्ये वाद आहे की नाही हे मला माहित नसल्याचे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं. असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. याबाबतचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. पण आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत.
महाविकास आघाडीने एकत्र जाण्याची स्पष्टता आहे. या पुढचे निर्णय कसे घ्यायचे याचा संवाद सुरू आहे, असं पवार यांनी सांगितलं. यावेळी पवार यांनी वंचितचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.