“सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”,बड्या नेत्याचा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठं भाष्य केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागणार आहे. या निकालानंतर सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु झाली, असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल, यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी चाहुल लागली आहे असं वाटतंय. साधारणतः सरकारचा कालावधी संपताना किंवा सरकार जाऊ शकते अशी वेळ येते त्यावेळी अशी लगबग सुरु असते. आम्ही सर्वोच्च न्यायलयातील निकालाची वाट पाहत आहोत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
पटोले म्हणाले की, “मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात लगबग सुरू आहे. आमच्या लोकांनी सांगितलं की मंत्रालयातील लगबग फारच वाढली आहे. जुन्या फाईल्स पटापट काढल्या जात आहेत. त्यावरुन असं वाटतंय की त्यांना (सत्ताधाऱ्यांना) काहीतरी चाहूल लागली आहे.”