ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

0 46

शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं विसरुन जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे अशी टीकाही त्यांनी केली. यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जागून दाखवा असे आवाहन त्यांनी बंडखोरांना केलं

शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला. हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपासोबत जाण्यासाठी दबाव असल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

भाषणातील महत्वाचे मुद्दे –

१) कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
२) मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता.
३) मला स्वप्नातही कोणी वर्षा की मातोश्री विचारलं तर मातोश्रीच उत्तर असेल.
४) मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं.
५) पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरिरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते.
६) काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असं म्हणाले होते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचं काम करत आलो आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदं दिली.
७) तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजववेली मूळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे.
८) ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. त्यांनी जावं, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.
९) भाजपासोबत जावं यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंड नाही.
१०) आपण प्रत्येक वेळी त्यांना महत्वाची खातं दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असतं, पण त्यांना दिलं. संजय राठोड यांचं वनखातं माझ्याकडे घेतलं. साधी खाती मी माझ्याकडे ठेवली.
११) मला आता या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे.
१२) आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे. स्वत:चा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काही करायचं नाही का?
१३) आपल्या माथी अनेकदा पराभव झाला, पण त्याने फरक पडत नाही. जिंकणं, पराभव मनावर अवलंबून असतं. हारल्यानंतर जिंकण्यासाठी जनता साथ देत असते. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. सेनेत माझ्यासोबत जी बुडेल ती निष्ठावंत सेना आहे.
१४) जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे समजा
१५) तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार आहे.
१६) शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं विसरुन जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. बाळासाहेबांसाठी माझ्यापेक्षा शिवसेना लाडकं अपत्य आहे.

error: Content is protected !!