मन तेजाचे राऊळ
सुशांत सिंग राजपूत नंतर, कालपासून सोशल मीडिया वर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलंय. अर्थात चर्चा तर व्हायलाच हवी. पण दुर्दैवाची बाब ही आहे की मानसिक आरोग्यविषयक अशी चर्चा होण्यासाठी इतकं भयंकर काहीतरी घडावं लागतं. अजून खेद वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे चार दिवस, आठवडाभर चर्चा, स्टेटस, पोस्ट करून सगळे सोशल नेटकरी मानसिक आरोग्य ही कल्पना विसरून दुसऱ्या कुठल्यातरी खळबळजनक बातमी बद्दल बोलतील. गरज आहे ती चर्चेच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याची – स्वतःसाठी, स्वतःच्या जिवलगांसाठी आणि समाजासाठी सुद्धा. ते नेमके काय हे सांगण्याचा प्रयत्न म्हणून हा लेखप्रपंच.
मुळात ‘आपल्या प्रॉब्लेम्स बद्दल बोला रे!’ अस कितीही पोस्ट, स्टेटस आणि लेखांनी घसा फोडून सांगितलं तरी तसे करणे कठीण आहे हे आधी आपण सगळ्यांनी मान्य करायला हवे. तुम्हीच विचार करा, मनाच्या खोल तळाशी, कुठल्यातरी कप्प्यात घट्ट बंद करून ठेवलेल्या त्रासांबद्दल बोलणे एवढे सोपे कसे असेल? शिवाय तसे बोलायचे ठरवले तरी तेवढा संवेदनशील, खरीखुरी काळजी असणारा श्रोता मिळेलच याची शाश्वती काय? इतके कष्ट घेण्यापेक्षा रोजच्या रूटीन मध्ये, भरपूर कामांमध्ये (दुर्दैवाने कधी दारू, सिगारेट मध्ये) या सगळ्या त्रासांना बुडवून टाकणे आपल्याला जास्त सोपे वाटते. या बुडवा बुडवी प्रक्रियेमुळे आपल्याला वाटते की आता हे त्रास संपले, सगळं काही ठीक चाललंय. मित्रांनो, लक्षात घ्या, असे वाटणे हा फक्त आभास आहे. अशा खोलवर दाबून, दडपून ठेवलेल्या त्रासदायक भावना, विचार, कल्पना आपोआप नष्ट होतं नसतात.
काही काळासाठी त्या बाजूला ठेवल्या जातात एवढंच. पण जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल, जेव्हा अतिशय गुंतवून टाकणारं काम तुमच्याकडे नसेल, तेव्हा ऑक्टोपस सारखे हे सगळे त्रास हळूहळू तुमच्याभोवती पाश आवळायला तयार असतील. त्याची परिणीती कधी आत्महत्येमधे होऊ शकते, कधी व्यसनांमध्ये, तर कधी रक्तदाब, मधुमेहासारख्या शारीरिक व्याधींमधे. यातला कुठलाच परिणाम अर्थातच हवाहवासा नाही. आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी स्वतःच्या दुखऱ्या भावना व्यक्त करण्याचं शिवधनुष्य हे प्रत्येकाला पेलायलाच हवं. त्या ऐकून घेणारा श्रोता- मित्र, भाऊ बहीण, आईबाबा, शिक्षक- तुमच्याकडे असेल तर छानच आहे.पण तस नसेल तर त्यासाठी समुपदेशकांची मदत घ्यायला हवी.
आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही आपल्या समाजात समुपदेशन करून घेण्याबद्दल असलेला दूषित पूर्वग्रह. समुपदेशक/ मानसतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या मनात असलेल्या ज्या पूर्वसमुजती नेहमी आढळून येतात, त्याबद्दल थोडेसे लिहीणे आवश्यक वाटते.
समुपदेशकाकडे जाणे हे अजूनही काहीतरी भयंकर समजले जाते, जो अशी मदत घेतो तो समाजाच्या नजरेत एकतर अगदी gone case (वेडा) ठरतो किंवा स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः ज्याला सोडवता येत नाहीत असा दुबळा! याच उत्तर फक्तं एवढंच आहे की असा माणूस स्वतःच जीवन अधिकाधिक चांगलं व्हावं म्हणून धडपडणारी एक व्यक्ती आहे आणि असा ध्यास असणं हे खर तर अतिशय शहाणपणाच लक्षण आहे.
जिथे मलाच माझ्या भावना नीट कळेना झाल्यात तिथे समुपदेशकाला काय कळणार त्या, असही बऱ्याच लोकांना वाटतं. पण एक लक्षात घ्या कुठल्याही समुपदेशकाने याचंच तर प्रशिक्षण घेतलेलं असतं! आमच्याकडे येताना लोकांनी एकसंध सुरेख भावना विचार त्रास यांचा निबंध घेऊन यावा अशी मुळी आमची अपेक्षाच नसते. उलट ते तस नसणार हे गृहीत धरून, त्या भावना अजूनाजून सुस्पष्ट कशा करता येतील याचा विचार आम्ही केलेला असतो. तेव्हा काय बोलू कस बोलू याचा फारसा विचार न करता खुशाल मोबाईल अनलॉक करा आणि समुपदेशकाचा नंबर फिरवा.
हा नंबर मिळवण्यासाठी गूगल बाबा, फेसबुक- इंस्टाग्राम, कदाचित काही परीचीतांकडून मिळणारा संदर्भ असे पर्याय उपलब्ध आहेतच. मात्र ज्या समुपदेशकाकडे जाणार असाल, त्याच्या शैक्षिणक पदव्या, अनुभव हे सर्व नक्की तपासून पाहा. मानसतज्ज्ञ (psychologist) म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने समुपदेशन (counseling) किंवा चिकित्साविषयक (clinical) मानसशास्त्र असा विशेष विषय घेऊन M.A. केलेलं असलं पाहिजे. समुपदेशक म्हणवून घेणाऱ्यानी किमान एक ते दीड वर्षाचा diploma, एखाद्या मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून केलेला असला पाहिजे. दुर्दैवाने दोन तीन महिन्याचे छोटे मोठे कोर्सेस करून स्वतःला समुपदेशक म्हणून जाहीर करणाऱ्या व्यक्तींची संख्या भारतात कमी नाही. त्यांचा उद्देश कितीही चांगला असला तरी केवळ दोन तीन महिन्यांचे प्रशिक्षण इतक्या नाजूक बाबी हाताळणाऱ्या क्षेत्रासाठी पुरेसे नाही.
लेख संपवताना एकच गोष्ट नमूद करते. काही वर्ष या क्षेत्रात काम करताना मी अवसाद (depression) व्यक्त होण्याच्या अचंबा वाटावा इतक्या तऱ्हा पहिल्या आहेत. कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा सतत येणारं चिडचिडलेपण, कधी कारणाशिवाय सारखा पाठपुरावा करणारी उदासीनता, कधी निद्रानाश तर कधी खूप जास्त येणारी झोप, कधी खाण्यावरून उडालेल मन तर कधी खूप वाढलेलं जेवणाच प्रमाण, कधी हुंदके तर कधी नुसताच निरुत्साह, कधी नेहमीचं काम करण्यासाठी होणारे कष्ट आणि आता काहीच करता येणार नाही अशी टोचणारी अफाट निराशा, कधी आता सगळं संपवूनच टाकूया अशी लागलेली दुर्दैवी आस. यांपैकी काहीही तुम्हाला तुमच्या वागण्यात दिसत असेल, किंवा तुमच्या जवळच्या जिवलग व्यक्तीमध्ये ही लक्षणं आढळून येत असतील तर समुपदेशकांची मदत लवकरात लवकर घ्या.
मानसिक आरोग्य विषयक समस्या कोणालाही भेडसावू शकतात. मनाचा विचार करताना मला सुधीर मोघ्यांची एक सुप्रसिद्ध कविता नेहमी आठवते. मनाच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाचे वर्णन करताना ते लिहितात,
“मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा”
आणि खरोखरच आपल्या मनाचा थांग भल्याभल्यांना सुद्धा नेहमीचं लागतो अस नाही. पण पायात रुतलेला काटा जसा आपण त्वरित काढून फेकून देतो, त्याला लपवून, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही, तसचं मनाच्या समस्यांचा सामना करण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठा खूप कठीण नाही तर सहज सोपा हवा.
कवितेतील पुढच्याच ओळी मनाची दोन वेगळी रूपे अधोरेखित करतात,
“मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल”
तर आपल्या नाठाळ मनाला तेजाचे राऊळ बनवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. आणि केवळ एक दिवसापुरते नाही तर रोजाच्या रोज करण्याचे काम आहे एवढी आठवण देऊन हा शब्दप्रपंच आवरता घेते.
– वेदवती परांजपे-सुर्वे
matrimonial वेबसाईटवर जोडीदार शोधताय ? मग हे नक्की करा
शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात; कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार