राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी मांडली भूमिका!
शब्दराज ऑनलाईन,दि 23 ः
गेल्या महिन्यात राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या परीक्षा मात्र घेतल्या जातील असं देखील सांगितलं होतं. सीबीएसई बोर्डानं देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे एकूणच राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेमकं काय होणार? या संभ्रमात विद्यार्थी आणि पालकही असताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
येत्या दोन दिवसांत निर्णय?
उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका या एकूणच विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असून त्यावेळी परीक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं. त्यामुळे या परीक्षांबाबत येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परिपरीक्षेसंदर्भात बैठक पार पडली त्यात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांशी देखील संवाद साधला यात महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घ्याव्यात की नाही, घेतल्या तर त्या कश्या स्वरूपात असाव्या या संदर्भात आज या बैठकीत चर्चा करण्यात आली प्रत्येक राज्याने यात आपली भुमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने राज्यांना मंत्रीमंडळ बैठकीत अथवा शिक्षण विभागाने बैठक घेऊन याबाबत निर्णय घ्यावा असं मत केंद्राने मांडले आहे.
दरम्यान या बैठकीत आम्ही कोणत्याही परिस्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार नाही. एसएससी बोर्डाची देखील मी आता बैठक घेणार आहे मात्र येत्या दोन दिवसांबाबत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून यावर निर्णय जाहीर केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दरम्यान उच्च न्यायालयानेदेखील राज्य सरकारने दहावीच्या परिक्षा रद्द करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी भुमिका घेतली होती आणि राज्य सरकारला उत्तर द्यावे असे आदेश दिले होते.
याबाबत सुद्धा आम्ही कोरोनाची गंभीर परिस्थिती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, त्याचप्रमाणे राज्यात तिसरी लाट आली तर त्यात सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आम्ही न्यायालयात मांडू असे मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. राज्यात एसएससी बोर्डाचे तब्बल 14 लाख विद्यार्थी आहेत. यातल्या एकाही विद्यार्थ्याचे आम्ही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.