लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार..मंत्र्याचे विधान वादात
राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरत घसघशीत बहुमताने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यात महत्वाचा वाटा बजावणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा 9 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधासभेच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती.
मात्र नोव्हेंबर महिन्यात निकाल लागून महायुती पुन्हा सत्तेवर आली, डिसेंबरमध्ये शपथविधी झाला, मार्चमध्ये नव्या सरकारचा अर्थसंकल्पही झाला. पण अजूनही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं कधीपासून लक्ष लागलं असून सरकारमधील मंत्री मात्र त्यावर काहीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. योग्य वेळेवर निर्णय घेऊ, लवकरच घोषणा होईल, अशी उत्तर देतं सरकारमधील मंत्र्यांकडून या मुद्यावरून फक्त टोलवाटोलवी सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार असल्याचं वैद्यकीय शिक्ष मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. 2100 रुपये दिल्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मत मिळणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे, असंही मुश्रीफांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण मुश्रीफांचं हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार. त्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मत मिळणार नाहीत याची आम्हाला माहिती आहे. तसचे नमो सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी होणार ही खोटी बातमी आहे. कोणत्याही महिलेचे पैसे कमी केले जाणार नाहीत, असेही मुश्रीफांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी आणि विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप हसन मुश्रीफ यांनी केला.