शिक्षणानेच माणसाची प्रगती होऊ शकते – प्राचार्य डॉ.मनोहर नलावडे

0 10

पूर्णा,दि 05  प्रतिनिधी – शिक्षणानेच माणसाची प्रगती होऊ शकते म्हणून जीवनात शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.मनोहर नलावडे यांनी केले. येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रा.डॉ. सुनिता काळे (पवार) यांच्या सेवा गौरव सोहळ्यात ते अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते .
परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्ष प्रा.डॉ.सुनिता काळे (पवार)यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात बोलताना म्हणाले की, प्रा.डॉ.सुनिता काळे (पवार) शिस्त आणि संस्काराचे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन आधार दिला.
आज त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी जपलेल्या नात्याचा कृतज्ञपणा विण नात्याची या ” सेवा गौरव ग्रंथात ” आपल्या भावना व्यक्त करून सिद्ध केला आहे . त्यांच्या सेवा कार्यकाळाची हीच खरी शिदोरी असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ,परभणी येथील सेवानिवृत्त प्रा.डॉ.रमण्णा मॅडम, प्रा. डॉ.सुरेखा भोसले,प्रा.डॉ. संजय कसाब यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रा.डॉ.सुनिता काळे (पवार )यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की ,जीवनात आचार ,विचार व उच्चारला शिक्षकांनी अधिक महत्त्व दिले पाहिजे.यामुळे शिक्षक हा आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो. शिक्षकांनी ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करून त्यांच्या जगण्याचा स्तर कसा उंचावला जाईल असे संस्कार केले पाहिजे.तरच उद्याचा माणूस राष्ट्र निर्मितीसाठी कुशल व संस्कारीत घडेल असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. सुरेखा भोसले यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा‌.डॉ.संतोष कुऱ्हे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!