मोठी बातमी.. शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात ?

0 197

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानतंर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चिन्ह दिसू लागलेली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ज्या शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला उदयास आणलं आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्हंही मिळवलं त्याच शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल  लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यानंतर काही राजकीय समीकरणं बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्यानंतर हे वृत्त समोर आल्यामुळं या चर्चांना आणखी वाव मिळाला आहे. मविआच्या बाजूनं राज्यातील जनतेनं कौल देत महायुतीला हा मोठा धक्का ठरल्यानं शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटाकडे परतणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीमुळं राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलं असून, नव्या समीकरणांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी  दिली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार 

आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्यानं ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी  याबाबत प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, “6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते.”

“आता लोकसभा निवडणुकांमध्येही अनेक आमदारांनी, अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेत आमचा विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. पण, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की, दरवाजे बंद आहेत.”

error: Content is protected !!