मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा

1 146

मुंबई,दि 27 (प्रतिनिधी)ः
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अडचणीत सापडले. त्यांच्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली यानंतर अटक आणि जामिन असा संपूर्ण संघर्ष पाहायला मिळाला. आता राणेंनी जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केली असली तरीही वाद पूर्णपणे निवळलेला नाही. दरम्यान आज सह्याद्री अतिथीगृहावर वेगळे चित्र पाहायला मिळाले. या संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये नेमके काय ठरले याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ओबीसी आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीयांची बैठक आज सह्याद्री अतिथिगृहामध्ये पार पडली. या बैठकीनंतर या दोन्हीही नेत्यांमध्ये ही बंद दाराआड चर्चा झाली. या दोघांच्या वेगळ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सुरुवातीला फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येही चर्चा झाली आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेट झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकीकडे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असताना मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीमुळे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

error: Content is protected !!