भाजपाचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांची विजयाची हॅट्रीक

0 45

शब्दराज ऑनलाईन,दि 11 ः
 राज्यसभा निवडणुकीत  पुरेसं संख्याबळ नसतानाही आघाडीच्या  अपक्षांना आपल्याकडे खेचून आणत भाजपच्या ) उमेदवाराला विजयी करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. पुरेसं संख्याबळ, राज्यात सत्ता, तीन पक्ष एकत्रं, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंसारखे मुरलेले राजकारणी दिमतीला आणि मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असूनही शिवसेनेला आपला उमेदवार विजयी करता आलं नाही. महाविकास आघाडी केवळ शक्तीप्रदर्शन करत राहिली अन् तिकडे फडणवीसांनी कोरोना झालेला असतानाही घरात बसून सूत्रं फिरवत आघाडीचा खेळ बिघडवून टाकला. केंद्रीय नेत्यांना पटवून देत त्यांनी सातव्या जागेवर भाजपचा उमेदवार दिला आणि ही सीट जिंकूनही दाखवली. त्यामुळे फडणवीसांचा प्रचंड कौतुक होत आहे. या विजयामुळे त्यांना चाणक्य, बाजीगर अशा उपाध्या दिल्या जात आहे. या निवडणुकीमुळे राज्य भाजपावर फडणवीसांची मजबूत पकड निर्माण झाली असून केंद्रातही त्यांचं वजन वाढलं आहे. फडणवीस जिथे जिथे निवडणुकीत लक्ष घालतात तिथे तिथे भाजप विजयी होत असल्याचं चित्रंही या निमित्ताने तयार झालं असून गोवा, बिहारनंतर आता फडणवीसांनी महाराष्ट्रातही विजयाची हॅट्रीक साधली आहे.

आधी गोवा सर

गोवा विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे निवडणूक प्रभारी होते. निवडणूक प्रभारी केल्यानंतर फडणवीस यांनी थेट गोव्यात मुक्काम ठोकला होता. या निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांनी बंड केलं. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या. पण फडणवीस यांनी या सर्व अडचणी समोर ठेवूनच त्यांनी प्लॅन तयार केला. छोट्या पक्षांना त्यांनी आपल्यासोबत घेतलं. प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास केला. निवडून येणारे मतदारसंघ, कमी आणि अधिक मेहनत करावे लागणारे मतदारसंघ, निवडून येऊ शकणारे उमेदवार, निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे आणि प्रचार तंत्र या सर्व गोष्टी त्यांनी स्वत: हाताळल्या आणि गोव्यात भाजपला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यामुळे गोव्यात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता असतानाही तिथे भाजपचं सरकार आलं.

तेच बिहारमध्ये घडलं

जे गोव्यात घडलं तेच बिहारमध्येही घडलं. बिहार विधानसभा निवडणुकीतही फडणवीस बिहारचे निवडणूक प्रभारी होते. बिहारमध्ये भाजप स्ट्राँग होता. पण लालू प्रसाद यादव यांच्या राजदचं आव्हान होतं. शिवाय नितीश कुमार यांच्या पक्षापेक्षा अधिक जागा निवडूनही आणायच्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत फडणवीसांनी वेगळी रणनीती आखली. फडणवीसांनी बिहारच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दयावर अधिक भर दिला. रोजगार, बेरोजगारी आणि नितीशकुमार सरकारने केलेली विकासाची कामे हे मुद्दे त्यांनी लावून धरले. तसेच लालूप्रसाद यादव यांच्या काळातील गैरकारभार वारंवार मांडून लालू सरकारची तुलना नितीश कुमार सरकारशी करत लोकांच्या मनात भाजप-नितीश कुमार युतीला विजयी करण्याचं बिहारी जनतेला पटवून दिलं. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळालं. भाजपच्या पाठिंब्याने नितीशकुमार मुख्यमंत्री बनले. गोवा आणि बिहारमधील विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांचं पक्षातील वजन अधिकच वाढलं.

मिशन राज्यसभा

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक ही खरंतर भाजपसाठी कसोटीच होती. कारण भाजपकडे सातव्या उमेदवारासाठीचं अपेक्षित संख्याबळ नव्हतं. तरीही भाजपने ही जागा लढवण्याचा केंद्रीय नेतृत्वापुढे आग्रह धरला. फडणवीसांनी वरिष्ठ नेत्यांना सर्व गणितं समजावून सांगितलं. केंद्रातील नेत्यांनीही फडणवीसांवर विश्वास टाकला आणि सातवा उमेदवार मैदानात उतरला. या काळात आघाडीने आमदारांचं हॉटेलिंग करण्यापासून ते शक्तीप्रदर्शन करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी केल्या. या सर्व गोष्टी फडणवीस पाहात होते. त्याचवेळी फडणवीसांना कोरोना झाला. त्यामुळे आता काय? असा सवाल भाजपमध्ये केला गेला. पण फडणवीसांनी घरातच राहून सूत्रे हलवली. सर्वांशी फोनाफोनी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका सुरू केल्या. मतदानाला तीन दिवस बाकी असताना फडणवीसांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि फडणवीस अजूनच सक्रिय झाले. फडणवीस कोणत्याही अपक्षांना भेटले नाहीत. कोणत्याही छोट्या पक्षांच्या नेत्यांना भेटले नाहीत. पण त्यांनी सर्व सूत्रे हलवली आणि भाजपच्या ओंजळीत आघाडीची 10 मते आली आणि भाजपचा उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला.

error: Content is protected !!