ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक

0 1,096

रत्नागिरी:केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.

राणे यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, राणे यांचा जामीन अर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांन तूर्त कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. दरम्यान, राणे यांच्यावरील कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींवर राणे समर्थकांनी दोन खुर्च्या फेकल्याने तणाव निर्माण झाला. त्यावर प्रमोद जठार यांनी सर्वांची माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
भाजपकडून मात्र वेगळा दावा करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नाही. पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली. मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत, असा दावा यावेळी भाजपचे प्रमोद जठार यांनी केला आहे. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकच तसं बोलले आहेत. कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यावर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का?, असा सवालही जठार यांनी केला.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी याबाबत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. राणे यांच्याकडून अटक वॉरंटची मागणी करण्यात आल्याचे अधीक्षकांनी सांगितले. त्यावर सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही वाट कशाला पाहता. पोलीस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा, असे परब यांनी अधीक्षकांना सांगितले.

error: Content is protected !!