Corona : चीनने पुन्हा टेन्शन वाढवलं, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश
नवी दिल्ली – जगभरात पुन्हा एकदा करोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिले पाहिजे. करोना संबंधीत आरोग्य व्यवस्थापनेची सर्व तयारी केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज दिले आहेत. या संदर्भात राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून काम करण्याची सूचनाही त्यांनी केली.
चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स या देशांमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असल्याने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच आता नाताळ आणि थर्टी फर्स्टमुळे धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी करोनासंबंधीत सद्यस्थिती काय, तसेच राज्यांची त्यासंदर्भात तयारी काय आहे याचा आढावा घेतला.
मनसुख मांडविय म्हणाले, जगभरात करोनाच्या वाढत्या धोक्याचा पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांचा फॉलोअप घ्यावा, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि लसीकरणावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी सर्व राज्यांना दिले. राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावे आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे, असेही त्यांनी सांगितले.
कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी खाली दिलेल्या योग्य वर्तनाचे पालन करणे महत्वाचे आहे –
सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे
इतरांपासून अंतर राखणे
साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आणि
आजारी असताना घरी अलगीकरणात राहणे.
वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
सर्व नागरिकांनी लसीकरण आणि प्रिकॉशनरी डोस घ्यावा.