तीन पिढ्या नंतर कन्यारत्न झाल्याने केले जल्लोषात स्वागत

नैताळे येथील भवर कुटुंबात मुलीच्या जन्माने आनंदोत्सव-

0 188

निफाड,दि 24 (प्रतिनिधी)ः
कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक | तयाचा हरीक वाटे देवा ! संत वाङ्म् यात संतांनी असे वर्णन केले आहे.असाच काहीसा संदर्भ घेऊन नैताळे येथील प्रगतिशील शेतकरी शंकर बाबुराव भवर यांनी आपला मुलगा नकुल व स्नुषा स्वाती यांना झालेल्या कन्यारत्नाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
‘ पहिली बेटी धनाची पेटी ‘ असते मात्र, ग्रामीण भागात केवळ वंशाचा दिवा हवा म्हणून मुलगा व्हावा ही रूढी किंवा मानसिकता आहे. मुलींना आजही समाजात दुय्यम स्थान आहे. मात्र आज मुलींनी किंवा स्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देश विकासासाठी मोठे योगदान दिले आहे व देत आहेत. कोणत्याही क्षेत्रात महिला किंवा मुली या मागे राहिल्या नाही त्यामुळे मुलांऐवजी मुलीचे स्वागत ग्रामीण भागातून होऊ लागले आहे हा एक आशेचा किरण आहे.
भवर कुटुंबातील तीन भावां मिळून एकच कन्यारत्न होते. त्यामुळे तिचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या पिढीतील पहिलीच कन्या जन्माला आली. भवर कुटुंबीयांनी मुलगा- मुलगी भेदभाव न करता नातीच्या आगमनार्थ फटाके, फुलांच्या वर्षाव, भजन, स्नेहभोजन अशा स्वरूपाचा कार्यक्रम करून आता ग्रामीण भागातही आता मानसिकता बदलत असून त्याचे प्रतीक म्हणून मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत केले आहे. त्यांच्या या उपक्रमाची परिसरात चर्चा असून नागरिकांनी देखील मलगी जन्माला आली म्हणून तिचा द्वेष किंवा तिचा भेदभाव न करता तिच्या जन्माचे स्वागत करावे असे आवाहन भवर कुटुंबियांनी केले आहे.

भवर कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत केले ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे. प्रत्येकाने सुनेला पण आपली मुलगी मानले तर ती सुद्धा सासू सासऱ्यांना आई बाप मानेल आणि खरच आपला देश फार पुढे जाईल. ज्या दाम्पत्यांना मुलीच आहेत त्यांनी आपल्या मुलींना साक्षात लक्ष्मी मानून मुला समान वागणूक देऊन त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करून आपला व आपल्या घराण्याचे नाव वाढविणे महत्त्वाचे आहे
मला पण दोन मुलीच आहेत मी त्यांना शिकवून मोठे करणार आहे इतरांनी पण हा भव्य कुटूंबाचा आदर्श घ्यावा.सौ.मनीषा आवारे संचालक, आवारे हॉस्पिटल लासलगाव.

error: Content is protected !!