ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हप्ता न आल्यानं लाडक्या बहिणी संतप्त झाल्या होत्या. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी महिलांनी आंदोलनं केली. बुलढाण्यातील संतप्त लाडक्या बहिणींनी १९ जानेवारीला महिला बाल कल्याण कार्यलयातच ठिय्या मांडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० जानेवारीला रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली.
या आंदोलनांची दखल घेत महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतलाय. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी बुधवारी राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. यात ई-केवायसीमध्ये चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा पडताळणी करण्यात यावी. त्यानंतर त्या महिलांना पूर्ववत लाभ द्यावेत असे स्पष्ट आदेश देण्यात आले. यामुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा दिलासा मिळालाय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांशी योजना आहे. ही योजना ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. योजना लागू करताना विविध अटी-शर्ती ठेवण्यात आल्या. तर सरत्या वर्षात २०२५ मध्ये सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलीय. मात्र केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या. त्यांनी चुकीचा पर्याय निवडल्याने राज्यातील लाखो महिलांचा दोन महिन्यांपासून लाभ मिळाला नाहीये.
दरम्यान महिलामधील वाढत्या असंतोषाची दखल घेत शासनाने तातडीने निर्णय घेतली आहेत. कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे सचिव अनुपकुमार यादव यांनी आपल्या बैठकीत सांगितले. दरम्यान येत्या आठ दिवसांत नवीन मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन) जारी करण्यात येणार आहे. यात ई-केवायसी चुकलेली,चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांची यादी तयार केली जाईल. अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून त्या महिलांना पुन्हा लाभ दिला जाईल.
Shabdraj www.shabdraj.com