28/02/26
Breaking News

आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या शाळेला विसरू नका-उल्हास पांडे

सेलू दि १७(प्रतिनिधी)
विद्यार्थी अवस्था ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय अनमोल क्षण असतात.विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवताना शाळेने केलेले संस्कार आयुष्यभर शिदोरी म्हणून सोबत ठेवावे आणि आपल्या जीवनात कितीही मोठे झालात तरी शाळेला विसरू नका असा मोलाचा सल्ला नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा श्री के.बा.विद्यालयाचे माजी विद्यार्थी उल्हास पांडे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके तर व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारासुरकर,वर्गशिक्षिका डॉ. जयश्री आडे सोन्नेकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुरेश मारेवाड यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
या कार्यक्रमात सुहाना शेख,किरण गायकवाड,अंजली कठारे,शुभांगी अवचार,ऋतुजा धापसे,ममता खरात,बळीराम काळे,तेजस काळे,सहशिक्षिका डॉ.जयश्री आडे, मुख्याध्यापक संजय धारासुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलतांना उल्हास पांडे म्हणाले की,मी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे.कारण शाळेने दिलेल्या संस्काराच्या बळावरच माझी यशस्वी वाटचाल झाली आहे.शाळेने तुमच्या पंखात दिलेल्या बळावर आयुष्यात उंच झेप घ्यायची आहे.जीवनात जिद्द,संयम,सचोटी,कठोर मेहनत आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार या बळावर आयुष्यात यश मिळवा असे त्यांनी सांगितले.यावेळी उल्हास पांडे यांनी जगदीश खेबुडकर यांचे ” आकाशी झेप घे रे पाखरा ” हे गीत गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेहान तांबोळी याने केले तर वर्गशिक्षिका डॉ जयश्री आडे(सोन्नेकर) यांनी आभार मानले.

Check Also

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी …