हिंगोली,दि 07 ः
हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यानिमित्त जिल्ह्यात १ मे ते ८ मे या कालावधीत ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये राबविला जात आहे.
जागतिक थॅलेसेमिया दिनी दिनांक ८ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश थॅलेसेमिया या गंभीर आजाराबाबत समाजात व्यापक जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांना गती देणे हा आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना चाचणीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.
थॅलेसेमिया म्हणजे काय? (लक्षणे व प्रकार)
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. यामध्ये शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी असते आणि त्या लवकर नष्ट होतात, ज्यामुळे रुग्णाला सतत रक्ताची कमतरता भासते.
प्रमुख लक्षणे:
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
त्वचा पांढरी किंवा पिवळसर दिसणे.
लहान मुलांची शारीरिक वाढ खुंटणे.
पोट फुगणे (प्लीहा वाढणे).
आजाराचे दोन मुख्य प्रकार:
१. थॅलेसेमिया मायनर: यामध्ये व्यक्तीला कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाहीत, परंतु ती व्यक्ती या आजाराची ‘वाहक’ असते.
२. थॅलेसेमिया मेजर: हा प्रकार गंभीर असून, रुग्णाला आयुष्यभर दर १५ ते २० दिवसांनी रक्त भरवावे लागते आणि नियमित औषधोपचार घ्यावे लागतात.
महत्त्वाची टीप: जर माता आणि पिता दोन्ही ‘थॅलेसेमिया मायनर’ असतील, तर त्यांच्या अपत्याला ‘थॅलेसेमिया मेजर’ होण्याची शक्यता अत्यंत जास्त असते.
प्रतिबंधात्मक उपाय.
लग्नाआधी चाचणी करणे, थॅलेसेमिया मायनर यांची स्क्रीनिंग करणे.
Shabdraj www.shabdraj.com