सेलू (नारायण पाटील )
जीवनात अशक्य असे काहीच नाही.समाजात जीवन जगत असतांना फक्त आपण स्वतः स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे.आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी ध्येय निश्चित करून ते यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करा असे मत तहसीलदार डॉ शिवाजी मगर यांनी केले.
येथील श्री के.बा.विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यावतीने आयोजित “हात मदतीचा “या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलतांना तहसीलदार मगर म्हणाले की,छत्रपती शाहू महाराजांच्या काळात देखील सामाजिक परिस्थिती पाहिली तर अनेकांना मदतीची गरज होती.ती सर्व मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली.लोककल्याणकारी राजा म्हणून शाहू महाराजांनी कार्य केले.शाहू महाराजांचे विचार देखील आपण अंगिकारले पाहिजेत.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात लहान लहान बाबीतून शिकायला पाहिजे.आत्तापासून जर आपण व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले तर जीवनात यशाचा मार्ग सुकर आहे.विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून खेळ खेळणे,अभ्यासाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असल्याचेही तहसीलदार मगर यांनी यावेळी सांगितले. सामाजिक बांधीलकी जपून “हात मदतीचा “या उपक्रमातून सुनील गायकवाड यांनी चालवलेला सामाजिक सेवा व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .
येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना “हात मदतीचा ” या कार्यकम शालेय साहित्याचे व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार ,मदन यादव , विवेकानंद विद्यालय सेलू चे कार्यवाह उपेंद्र बेलूरकर ,निवृत्त प्राध्यापक के डी वाघमारे , जालना यवथील निवृत्त गटविकास अधिकारी गुंजकर साहेब ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील ,के बा विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारासुरकर व कार्यक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती .
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज व कै दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली .शुकाचार्य शिंदे यांनी यावेळी शाहू महाराज यांच्यावरील गीत सादर केले .
यावेळी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सविस्तर माहिती दिली .अनेक दात्यांच्या सहकार्यातुन गेल्या सात वर्षांपासून आपण हा कार्यक्रम अविरतपणे राबवत आहोत . आतापर्यंत या उपक्रमात २६१२ गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले असून आज के.बा. विद्यालयात ५१ विष्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे . भविष्यात निश्चितच आपण हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणावर राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
यावेळी बोलतांना प्रा के .डी .वाघमारे साहेब म्हणाले की ,मी माझ्यासाठी जगत नसून समाजासाठी जगतो हे ब्रीद वाक्य सुनील गायकवाड यांना लागू होते . घरची गरिबी असतांना देखील मला शिकवण्याचे स्वप्न माझ्या आई वडिलांनी पाहिले होते .तेच स्वप्न सर्व विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे असते .व या स्वप्नपूर्तीसाठी सुनील गायकवाड यांचा हा मदतीचा “हात मदतीचा” निश्चितच महत्वाचा राहणार आहे .
सहकार्य करणारे पुष्कळ आहेत परंतु अशा सर्व दानशूर व्यक्तीची मोळी बांधून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सुनील गायकवाड हे हात मदतीचा कार्यक्रमाद्वारे करीत आहेत .हे अत्यंत कौतुकास्पदच आहे . कारण एक छोटासा भाजी व्यवसाय करत अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे .तरी देखील केवळ सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपल्या व्यवसायातून वेळ काढून ते हे कार्य करतात. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी मनोगतात उपेंद्र बेलूरकर यांनी केले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर मंजुषा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत ठाकूर ,पी. के . शिंदे ,शुकाचार्य शिंदे ,मंजुषा कुलकर्णी तसेच के. बा.विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले .