04/02/26
Breaking News

सुनेत्रा पवार नव्या उपमुख्यमंत्री,राजभवनात घेतली शपथ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते.  सुनेत्रा पवारयांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले.

सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या तरी, या काळात कोणतेही हार, तुरा किंवा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात साधेपणा आणि संवेदनशीलता जपण्यावर त्यांचा भर असणार आहे.

सुनेत्रा पवार यांचा परिचय

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Profile) यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) याठिकाणी झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला होता. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली.

बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.

घरापासून राजकारणापर्यंत अजित पवारांना दिली साथ

लग्नानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय ते गाईगुरे सांभाळणे, दूध काढणे अशी सर्व कामं सुनेत्रा पवार यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत आपली घरं सांभाळणे, नातेसंबंध जपणं, सामाजिक कार्य करणं, कठीणप्रसंगी दादांना साथ देणं आणि सल्लामसलत करणं, ही जबाबदारी त्यांनी पार पडली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा एक मोठा विक्रम होणार आहे. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षामध्ये राजकारणात प्रवेश झाला. त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीवेळा त्या उत्साहाने प्रचारात उतरत असत आणि बारामतीमध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर सुप्रिया सुळेंविरोधात त्या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला, यानंतरही त्या खचल्या नाहीत.त्या जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Check Also

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक …