04/02/26
Breaking News

भाजप नेत्यांनीच युतीचा गळा कापला,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांचा हल्लाबोल

परभणी,दि 30
परभणीत भाजप नेत्यांनीच युतीचा गळा कापला, असा हल्लाबोल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी चढवला आहे. स्वार्थासाठी या नेत्यांनी युती तोडली, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

परभणी महापालिकेच्या निवडणुकीत आधीच ठरलेला शिवसेना – भाजप युतीचा 13 -20 चा फार्म्युला भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी केसाने गळा कापला,अशा तीव्र शब्दांत जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर यांच्यावर टीका केली.

महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच शिवसेना – भाजप युतीला पोषक वातावरण होते. सोमवारी (ता. 29) सायंकाळपर्यंत शहरातील हिंदूबहुल 8 प्रभागांतील 33 वॉर्डांचे गणित लावून शिवसेना 13 आणि भाजप 20 जागांवर निवडणूक लढवेल, असा ठोस निर्णय झाला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी भाजपच्या अंतर्गत स्वार्थी खेळीमुळे युतीला सुरुंग लावण्यात आला.

प्रभाग क्रमांक 1, 4, 5 आणि 15 मधील जागा वाटपावरून भाजपने अचानक आडमुठेपणा घेतला आणि युती फिसकटली. चार – पाच दिवस सलग बैठका झाल्या, प्रत्येक बैठकीत सकारात्मक निर्णय झाले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी आमचे बोलणे झाले. त्यात त्यांनी शिवसेनेने 13 ऐवजी 12 जागेवर निवडणुक लढवावी अशी विनंती केली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमच्याकडे अशी विनंती केली.

त्यांच्या शब्दाला मान ठेवून आमच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने आम्ही एक पाऊल मागे घेतले. मात्र ऐनवेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युतीचा घात केला असे म्हणत भरोसे यांनी थेट सुरेश वरपुडकर यांच्यावर गंभीर आरोप केला. स्वतःच्या घरातील व्यक्ती व घरात काम करणाऱ्यांना उमेदवारी मिळावी म्हणूनच युतीत मिठाचा खडा टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर, वरपुडकरांचे हात फक्त शिवसेना – भाजप युतीतच नाहीत, तर शिवसेना (उबाठा), गुट्टे मित्र मंडळ आणि काँग्रेसमध्येही आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

भाजपसाठी अजूनही दरवाजे उघडे

भाजपचे निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर यांच्या स्वार्थी भूमिकेमुळेच शिवसेना – भाजप युती तुटली असा ठाम आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केला. तथापि, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत भाजपकडून (BJP) सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास शिवसेना पुन्हा विचार करण्यास तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. परभणी शहराचा सर्वांगीण विकास आणि हिंदुत्वाच्या व्यापक हितासाठी आम्ही पुन्हा एक पाऊल मागे घेण्यास तयार आहोत. भाजप नेत्यांनी फक्त प्रामाणिक भूमिका घ्यावी, असे आवाहन भरोसे यांनी केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …