गंगाखेड,दि 05 ः
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीकच वाहून गेले असताना, त्यांना आधार देण्यासाठी भारतीय किसान संघ पुढे सरसावला आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील पाऊल उचलत संघाकडून परभणी जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
दि. ०३ नोव्हेंबर रोजी परभणी, पुर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यातील एकूण पाच गावांमधील १० शेतकऱ्यांना हा थेट लाभ मिळाला. पिकांचे १०० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती नव्याने पेरणीची आशा देणारी ही मदत ठरली.या उपक्रमावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव बुचाले, उपाध्यक्ष मानिकराव भुजबळ, युवा प्रमुख सचिन अवचार, गंगाखेड तालुका अध्यक्ष दिगंबरराव काळे, माजी तालुकाध्यक्ष गंगाधरराव सूर्यवंशी आणि दिगंबरराव चोरघडे उपस्थित होते.शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करून सन्मान करण्यात आला. संकटाच्या काळात उभा राहिलेल्या या मदतीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.“शेतकऱ्यांच्या अडचणींना फक्त आवाज देणे नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीचा हात देणे हेच आमचे ध्येय,” असे जिल्हाध्यक्ष नामदेवराव बुचाले यांनी नमूद केले.
Shabdraj www.shabdraj.com