हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोलीजवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने गावात जलजीवन मिशन योजनेचे पाणी पोहोचले आहे.
जल क्रांती पॅनलने दिलेला शब्द पूर्ण करत गावात पाणी आणून दाखवले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बळसोंड गावातून सुरू झालेल्या या योजनेमुळे मुळगावापर्यंत पाणी पोहोचले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नवीन रस्त्याच्या कामामुळे काही ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सरपंच शैलेश जैस्वाल व संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com