हिंगोली,दि 28(प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हराळ-वरखेडा-केंद्रा-गोरेगाव-चोंडी-मालसेलू-खंडाळा ते राष्ट्रीय महामार्ग १६१ या रस्ता कामासाठी शासनाने तब्बल ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे.
या निधी अंतर्गत ३५.७० किलोमीटर लांबीच्या सिंमेट रस्त्याचे काम केले जाणार आहे.हा रस्ता हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रमुख गावांना थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा मुख्य दुवा आहे. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना शहरात ये-जा करण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.आता ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे या रस्त्याचा कायापालट होणार असून या रस्त्यामुळे विदर्भातील रिसोड तालुक्याशी संपर्क अधिक मजबूत होणार असून, पुढे समृद्धी महामार्गाशी जोडणी सुलभ होईल आणि परिसरातील हजारो नागरिकांची वाहतुकीची अडचण कायमची दूर होणार आहे.
या संदर्भात आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी बोलताना सांगितले की ग्रामीण भागाचा विकास हा रस्त्यांच्या दर्जेदार जोडणीवर अवलंबून असतो. मतदारसंघातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी हराळ ते खंडाळा दरम्यानच्या या रस्त्यासाठी ३४० कोटी रुपये मंजूर करून निधीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले.या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.व या कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Shabdraj www.shabdraj.com