राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातील निधी वितरणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून अधिकृतपणे सुरू केली आहे. याबाबतची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.
पुढील ४८ ते ७२ तासांत रक्कम जमा होणार
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपयांचे अर्थसहाय्य लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली दिसेल.योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने दरमहा १५०० रुपये दिले जातात. फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता प्रत्यक्ष निधी वाटप सुरू झाल्याने कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, अशा महिलांना प्राधान्याने हा लाभ मिळत आहे.
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे?
मंत्री अदिती तटकरे याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
ई केवायसी दुरुस्तीची 31 मार्च पर्यंत संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरु करण्यात आल्यानंतर त्या योजनेचे काही निकष तयार करण्यात आले होते. त्या निकषानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार होता. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्यावतीनं लाभार्थींसंदर्भात विविध विभागांकडून प्रथम माहिती मागवली. त्यानंतर राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यास सांगण्यात आलं होतं.
ई केवायसी प्रक्रिया मोबाईलवरुन किंवा संगणकावरुन पूर्ण करायची होती. ती पूर्ण करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याचं समोर आलं होतं. यामुळं ज्या महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले होते, त्यांना दुरुस्तीची संधी 31 मार्च पर्यंत देण्यात आली होती. आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी दुरुस्त करण्यास महिलांकडे 6 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
Shabdraj www.shabdraj.com