17/07/26
Breaking News

विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना अटक:2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली,दि 10 
आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून बुधवारी ता. १० सकाळी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटे जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

आखाडा बाळापूर परिसरात कालव्यावर तसेच कयाधू नदीवर विद्युतपंप बसवून शेती सिंचन केले जाते. मात्र रात्रीच्या वेळी चोरट्यांनी विद्युत पंपासोबतच केबल व पाईप चोरण्याचा सपाटा लावला होता. रात्रीच्या वेळी विज पुरवठा नसल्याने शेतकरी घरी गेल्याची संधीसाधत चोरट्यांनी हातसाफ करण्यास सुरवात केली होती. या प्रकारामुळे शेतरकी रात्रीच्या वेळी विद्युतपंपाजवळ पहारा देण्यासाठी थांबत असल्याचे चित्र होते. मात्र या प्रकरणात शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती.

2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले होते. यामध्ये उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार भुजंग कोकरे, शिवाजी जालमिरे, विशाल खंडागळे, आझम प्यारेवाले, मुनीर प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्‍वर गोरे, शंकर हराळ यांच्या पथकाने माहिती घेण्यास सुरवात केली होती.

यावेळी पोलिसांनी शेख वजीद शेख आयुब, शेख जिलानी शेख रब्बानी, संजय उर्फ न्यायपाल हिरामण नरवाडे (सर्व रा. शेवाळा) यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार विद्युतपंप, ८०० फुट केबल, एक तीनचाकी ॲटो असा २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक शरद मरे, जमादार बालाजी जोगदंड, प्रशांत शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …