17/07/26
Breaking News

अजित पवारांच्या मृत्यूच्या चार दिवसांत 75 संस्थांना अल्पसंख्यांक मान्यता

राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. तरीही ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात ही प्रक्रिया नेमकी कशी सुरू झाली आणि आदेश कुणाकडून दिले गेले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी देण्यात आले. हा दिवसच अजित पवार यांच्या अपघाताचा असल्याचे सांगितले जाते. त्याच दिवशी श्री माता कन्यका सेवा संस्थेला मान्यता देण्यात आल्याची नोंद आहे. सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ यांनाही 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आले. या दिवशी एकूण सात संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शासकीय कामकाजावर दुखवट्याचा परिणाम असताना ही प्रक्रिया कशी राबवली गेली, यावरून संशय अधिक गडद झाला आहे.

त्यानंतर 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 1 फेब्रुवारी हा रविवार असल्याने कोणतेही प्रमाणपत्र दिले गेले नाही. मात्र 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यात आला. ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र न देणाऱ्या विभागाने अवघ्या चार दिवसांत 75 संस्थांना मान्यता देणे ही बाब लक्षवेधी ठरली आहे. काही शाळांना शासकीय वेळ संपल्यानंतर सायंकाळी 6.45 आणि 6.58 वाजता प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या 75 संस्थांपैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या असल्याचे सांगितले जाते आणि त्यांनाही 29 जानेवारी या एकाच दिवशी दर्जा देण्यात आला. तसेच सेंट झेवियर्सच्या पाच शाळांना मान्यता मिळाली आहे. स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या चार शाळांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्रे रोखून धरली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर अचानक प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप केला जात आहे.

Check Also

शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना जाहीर; पहा पात्र व अपात्र कोण?

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात …