26/08/26
Breaking News

राजकारणात पुन्हा भूकंप, जयंत पाटील-विनोद तावडे यांच्यात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याचे संकेत असून, ठाकरे गटाला एकाकी पाडण्याची ही शरद पवारांची नवी खेळी असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष’ जर महायुतीमध्ये अधिकृतपणे सहभागी झाला, तर त्यांच्या वाट्याला सत्तेत नेमके काय येऊ शकते? यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर खल झाला. इतकेच नव्हे तर, महायुतीत थेट सामील न होता केवळ बाहेरून पाठिंबा देण्याच्या पर्यायावरही तावडे आणि पाटील यांच्यात चाचपणी झाल्याचे समजते. सत्तेसाठी सोयीचे राजकारण साधत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला महाविकास आघाडीत एकाकी पाडण्याचा हा शरद पवारांचा नवा डाव असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. तावडे यांच्याशी झालेल्या या दीर्घ चर्चेनंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांशीही संपर्क साधून पुढील रणनीतीबाबत संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

विरोधात असताना आपले प्रश्न सुटत नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नाही किंबहुना प्रकल्पांना सरकारची मदत न मिळाल्याने विकासाचे प्रश्न मागे राहतात, पर्यायाने मतदारसंघातील जनतेला उत्तरे देताना अडचण येते, अशी कारणे सांगून शरद पवार यांच्या पक्षातील आमदार-खासदारांना सत्तेसोबत जाण्याचे वेध लागले आहेत. तशी इच्छा त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत बोलून दाखवली आहे.
शिवसेनेसारखा दुसऱ्यांदा पक्ष फुटू नये, याची काळजी पक्षनेतृत्वाला असल्याने आमदार-खासदारांच्या इच्छेनुसार सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी प्राथमिकदृष्ट्या चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

अमित शाह-फडणवीस यांच्यातही चर्चा होणार

राज्यात विनोद तावडे-जयंत पाटील यांची चर्चा होत असताना तिकडे राजधानी नवी दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शाह यांच्यात चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मते फडणवीस अमित शाह यांच्या कानावर टाकणार असल्याची माहिती आहे.

Check Also

राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या

नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, …