27/04/26
Breaking News

अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान,महसूलमंत्र्यांनी केली घोषणा

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे योग्य पद्धतीने करण्यात यावे असेदेखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. खरात जमीन प्रकरणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करत असून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू आहे.

अधिक माहिती समोर आल्यास तपासाला गती मिळेल. मुख्यमंत्र्यांनीदेखील या प्रकरणात बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. एसआयटीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जमीन गैरव्यवहाराशी संबंधित माहिती महसूल विभागाकडे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे दुसरी चौकशी लावण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसआयटीच्या अहवालावर आधारित पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले. शासनाच्या लाडकी बहीण योजनांचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांना शोधण्यात येईल व त्यांना पुढे कुठलाही लाभ मिळणार नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.

Check Also

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून,दोन मे पासून सुट्या

: यंदा राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष …