गंगाखेड (प्रतिनिधी):
शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना “आधी थंप (अंगठा) नोंदणी व नंतर धान्य वितरण” अशी अट घालण्यात आल्याने अनेक लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सर्व्हर डाऊन, वीज खंडित होणे, बायोमेट्रिक मशीन नीट काम न करणे यामुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
अनेक वेळा थंप नोंदणी यशस्वी होत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य न मिळताच परतावे लागत असून वृद्ध, महिला व दिव्यांग नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी धान्य देऊन नंतर नोंद अशी पद्धत होती; मात्र आता उलट पद्धत राबवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासनाने तातडीने याबाबत स्पष्ट सूचना देऊन थंप नोंदणी अयशस्वी झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी, तसेच लाभार्थ्यांचे धान्य थांबवू नये अशी मागणी नागरिकांतून होत आहे.